मुंबई सिटीलाईन न्यूज नेटवर्क विद्यार्थ्यांसाठीच्या प्रमुख पाच ते सहा योजनांची माहिती देणारे फलक शाळांमध्ये लावले जावे,विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण वाढवावे अशा सुचना मंत्रालयात पार पडलेल्या शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी संबंधित विभागाला दिल्या.
विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या अनेक योजना असून त्यांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. यासाठी सर्व शाळांमध्ये प्रमुख पाच ते सहा योजनांची ठळक माहिती देणारे फलक प्रदर्शित केले जावे,असे निर्देश दिले.शालेय शिक्षण विभागाच्या विविध योजनांबाबत आढावा बैठक नुकतीच मंत्रालयात पार पडली.
यावेळी शिक्षणमंत्री भुसे म्हणाले की की,विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या वतीने अनेक योजना राबविल्या जातात.या योजनांची माहिती बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांना व पालकांना नसते. या योजनांपासून विद्यार्थी वंचित राहू नये म्हणून प्रयत्न केले जावे.
प्रमुख योजनांची माहिती ठळक स्वरूपात तीन बाय चार आकाराच्या फलकाद्वारे प्रत्येक शाळेमध्ये दर्शनी जागी लावली जावी.तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेतून अनाथ विद्यार्थ्यांसह, तसेच ज्याचे दोन्ही पालक अपंग आहेत असे विद्यार्थी, पॉक्सो कायदा अंतर्गत नुसार पिडित विद्यार्थी आदींना शिक्षणासाठी दरमहा २२५० रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.
महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने यासाठी नियुक्त संस्थांनी अशा बालकांचा शोध घेऊन त्यांची परिपूर्ण माहिती द्यावी. जिल्हा न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली समिती कडून यासाठी कार्यवाही केली जाते. एकल पालक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी कोरोना कालावधी सुरू केलेली योजना आता नियमित स्वरूपात सुरू आहे असे यावेळी सांगितले.
राज्यातील सर्व अनुदान व विनाअनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक नोंदणी आणि प्रमाणीकरण होणे गरजेचे आहे.एकूण २,१५,३४,१९९ विद्यार्थ्यांपैकी १०,४५,१२५ विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण होणे बाकी असून त्यासाठी कार्यवाही केली जावी अशा सूचना दिल्या. यावेळी शालेय शिक्षण विभागाच्या संबंधित विविध बाबींची माहिती सादरीकरणाद्वारे देण्यात आली.
