पिंप्री लौकी अजमपूर प्नतिनिधी महिला सशक्तीकरण आणि प्रतिष्ठेसाठी प्रयत्नशील राहणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे मूलभूत कर्तव्य असल्याचे भारतीय संविधानात (कलम ५१अ) स्पष्ट नमूद आहे. या पार्श्वभूमीवर,त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर (रमाई) यांच्या जयंतीनिमित्त दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या संगमनेर तालुक्यातील पिंप्री लौकी अजमपूर येथील महिला ग्रामशाखेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले.
नुकतेच आयोजित या कार्यक्रमात आशा खरात यांनी प्रमुख पाहुण्या म्हणून भाषण केले.त्या म्हणाल्या, "महिलांच्या प्रतिष्ठेसाठी प्रयत्नशील राहणे हे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य आहे." त्यांनी पुढे सांगितले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात महिलांच्या उत्कर्षासाठी समान संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.
माता रमाई आंबेडकर यांनी बाबासाहेबांच्या कार्यात दिलेल्या त्याग आणि समर्पणाची भेट म्हणूनच देशातील सर्व महिलांना प्रगतीची संधी मिळाली आहे.या शाखा महिलांना त्यांची प्रतिष्ठा प्रदान करण्यासाठी आणि सशक्त करण्यासाठी स्थापन करण्यात आल्या आहेत.
कार्यक्रमाच्या यावेळी अध्यक्षस्थानी शकुंतला जाधव होत्या.प्रसंगी ॲड.निकिता कदम यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी सर्वांना – विशेषतः महिलांना – स्वतःचा उत्कर्ष साधण्याची समान संधी दिली आहे.
माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला. या ग्रामशाखेच्या माध्यमातून स्थानिक स्तरावर महिला सशक्तीकरण, शिक्षण,जागृती आणि बौद्ध तत्त्वज्ञानाच्या प्रसारासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
हा कार्यक्रम महिलांच्या हक्क, प्रतिष्ठा आणि सामाजिक न्यायाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांमध्ये नवीन ऊर्जा आणि प्रेरणा निर्माण होईल,अशी अपेक्षा आहे.कार्यक्रमाच्या शेवटी महिलांच्या स्व-प्रयत्नातुन भोजन दान करण्यात आले.
