नाशिक दिनकर गायकवाड अंबड लिंक रोडवरील इंडियन पेट्रोल पंपासमोर महनगर पालिकेच्या वतीने जेसीबीच्या सहाय्याने सुरू असलेल्या खोदकाम दरम्यान जलवाहिनी फुटल्याची घटना घडली. लाखो लिटर पाणी वाया गेल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
सातपूर परिसरातील अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे जलवाहिनी फुटून मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त
केला आहे. जलवाहिनी फुटल्यानंतर संपूर्ण रस्त्यावर पाणी साचल्याने नागरिकांना त्या पाण्यातूनच मार्गक्रमण करावे लागत होते. या घटनेमुळे रस्त्यावर अक्षरशः पावसाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती.
महानगरपालिकेच्या संबंधित विभागाने योग्य नियोजन न करता खोदकाम केल्यामुळे ही घटना घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे व ठेकेदारांच्या निष्काळजीपणाच्या कामामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. याला जबाबदार असलेल्या ठेकेदारांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संदीप तांबे यांनी केली आहे.
