नाशिक दिनकर गायकवाड विनजित टेक्नॉलॉजीजचे असोसिएट उपाध्यक्ष विशाल भगवान अवचिते यांना संजीवनी फाउंडेशन यांच्या तर्फे शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले.
आयटी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य,नेतृत्वगुण,तसेच सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.साध्या आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत पार्श्वभूमीतून आलेल्या विशाल अवचिते यांनी मेहनत,सातत्य आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर आयटी क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.कमी वयात मोठी जबाबदारी स्वीकारत त्यांनी अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी प्रवास उभा केला आहे.
आयटी क्षेत्रातील कार्यासोबतच समाजाप्रती असलेली बांधिलकी त्यांनी नेहमीच जपली आहे. इंजिनिअरिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य करिअर दिशा, स्किल डेव्हलपमेंट, मुलाखतीची तयारी आणि कॉर्पोरेट जगताची ओळख करून देण्यासाठी ते सातत्याने मार्गदर्शन करत असतात. नोकरीच्या शोधात असलेल्या अनेक तरुणांना योग्य संधी मिळाव्यात यासाठी ते वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करतात.
शिक्षण आणि युवकांसाठी योगदान देताना त्यांनी ‘इंजिनिअरची गोष्ट’ आणि ‘बीऑड द जॉब’ ही दोन प्रेरणादायी पुस्तके लिहिली आहेत.या पुस्तकांमधून त्यांनी स्वतःचे अनुभव, संघर्ष, करिअरमधील वास्तव, तसेच तरुणांसाठी उपयुक्त मार्गदर्शन अतिशय सोप्या भाषेत मांडले आहे. ही पुस्तके आज विद्यार्थ्यांपासून पालक, शिक्षक आणि तरुण व्यावसायिकांपर्यंत सर्वांसाठी मार्गदर्शक ठरत आहेत. विशेष म्हणजे अनेक शाळांमध्ये ही पुस्तके विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून दिली जात आहेत.
याशिवाय शाळांना पुस्तके व शैक्षणिक साहित्य वाटप, गरजू विद्यार्थ्यांना मदत, सामाजिक उपक्रमांत सक्रिय सहभाग अशा विविध माध्यमांतून त्यांचे सामाजिक कार्य सुरू आहे. “शिक्षण आणि योग्य दिशा मिळाली तर कोणताही तरुण आपलं आयुष्य बदलू शकतो” हा विश्वास त्यांच्या कार्यातून ठळकपणे दिसून येतो.
या पुरस्कार सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्य मंत्री बचु कडु अणि पदमश्री रघुवीर खेडकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी सर्व पुरस्कारार्थींना शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल नाशिकसह महाराष्ट्रातून विशाल अवचिते यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
