राहुरी (प्रतिनिधी) तालुक्यातील राहुरी खुर्द येथे डिग्रस व बारगाव नांदूर या गणातील भाजपा महायुती कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच उत्साहात पार पडला.यावेळी बोलताना डॉ. विखे पाटील यांनी ही निवडणूक गट-तट न पाहता सर्वांनी एकत्र येऊन लढवण्याचे आवाहन केले. अक्षय कर्डिले यांना अभूतपूर्व मताधिक्याने निवडून देणे हीच दिवंगत शिवाजी कर्डिले यांना खरी श्रद्धांजली ठरेल,असे त्यांनी सांगितले.राहुरी खुर्द येथे आयोजित या संवाद मेळाव्यास भाजपा महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रसंगी बोलताना डॉ. विखे पाटील पुढे म्हणाले की, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी प्रचंड परिश्रम घेत शिवाजीराव कर्डिलेंना मोठ्या मताधिक्याने विजयी केले.मात्र त्यांच्या अकाली निधनामुळे ही पोटनिवडणूक अनपेक्षितपणे समोर आली आहे.त्यामुळे ही निवडणूक केवळ राजकीय नसून भावनिक आणि जबाबदारीची असल्याचे त्यांनी नमूद केले.
राहुरी तालुक्याशी विखे पाटील परिवाराचे ऋणानुबंध मतदानापलीकडचे असल्याचे सांगत त्यांनी विविध विकासकामांचा आढावा घेतला. नगर-मनमाड रस्त्यासह अनेक प्रश्न सोडवण्यासाठी स्वतः पुढाकार घेतल्याचे त्यांनी सांगितले. पण या उलट काही लोक आले फोटो आणि व्हिडिओ काढून गेले पण असा मिश्किल टोला त्यांनी विरोधकांना लगावला.पद असो वा नसो,काम करण्याची भूमिका महत्त्वाची असते,असेही ते म्हणाले.
यावेळी तनपुरे परिवाराने दाखवलेल्या राजकीय मोठेपणाचे त्यांनी कौतुक केले. संयम,समन्वय आणि परस्पर सन्मान राखून सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन करत,गावपातळीवर प्रचार अधिक प्रभावी करण्याचे आवाहन त्यांनी केले.मेळाव्यात उपस्थित कार्यकर्त्यांनी उत्साहाने सहभाग घेत अक्षय कर्डिले यांच्या विजयासाठी पूर्ण ताकदीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
