लोणी रुपाली भालेराव भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती राहाता तालुक्यातील लोणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (मुले) येथे अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या माध्यमातून महामानवाच्या क्रांतिकारी विचारांना उजाळा देण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दत्ता पवार होते,तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक गोरक्षनाथ चव्हाण यांनी केले. आपल्या प्रास्ताविकातून त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे महत्त्व विषद करतानाच त्यांच्या संपूर्ण जीवन पटाचा आढावा घेतला आणि विद्यार्थ्यांसमोर त्यांच्या संघर्षाची गाथा मांडली.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ज्ञानदेव कोकणे यांनी आपल्या ओघवत्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अष्टपैलू व्यक्तित्वाचा आणि अद्वितीय कर्तृत्वाचा मागोवा घेतला.बाबासाहेबांनी ज्या प्रकारे कठोर परिश्रम घेऊन ९ भाषा अवगत केल्या आणि ३२ पदव्या संपादित केल्या,तो आदर्श आजच्या पिढीतील विद्यार्थ्यांनी डोळ्यासमोर ठेवायला हवा,असे त्यांनी आवर्जून सांगितले.
वाचनानेच माणूस प्रगल्भ होतो आणि प्रगती करू शकतो,असा मोलाचा संदेश त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला.महामानवाच्या शैक्षणिक प्रवासातून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी आपले भविष्य उज्ज्वल करावे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे घटनेचे शिल्पकार व दलितांचे कैवारी म्हणून सर्व परिचित आहे ग्रामीण भागाचे इतर रक्षक आणि शेतकऱ्यांच्या परिवर्तनासाठी त्यांनी मांडलेले विचार सर्वांसाठी मार्गदर्शक ठरलेले आहेत.
शेतकऱ्यांच्या शोषणेबाबत त्यांनी परखड विचार मांडले तसेच स्त्री मुक्ती विषयी डॉ.आंबेडकर यांचा स्त्री विषयक दृष्टिकोन केवळ सहानभूतीचा नव्हता तर तो हक्क आणि न्याय यावर आधारित होता ते नेहमी म्हणत असे ज्या समाजात स्त्रीला समान अधिकार मिळत नाही तो समाज कधीही प्रगती करू शकत नाही स्त्रीला शिक्षण, स्वातंत्र्य आणि आत्मसन्मान मिळाल्याशिवाय सामाजिक परिवर्तन होणे शक्य नाही असा त्यांचा ठाम विश्वास होता.
बालविवाह, विधवांचे दयनीय अवस्था,बहु पत्नीत्व स्त्रीला स्वातंत्र्य अस्तित्व न देणे ही अमानवी परंपरा समाजात प्रचलित होती बाबासाहेबांनी या प्रथांना स्त्रीला गुलाम समजणे ही समाजाची मानसिक गुलामी आहे स्त्रीला स्वतंत्र व सन्माननीय जीवन जगण्याचा अधिकार मिळालाच पाहिजे हा त्यांनी विचार सातत्याने समाजापुढे मांडला.
डॉ.आंबेडकर हे भारतीय संविधानाचे प्रमुख शिल्पकार होते संविधानाच्या माध्यमातून त्यांनी स्त्रीला कायदेशीर संरक्षण दिले शिक्षण व रोजगारात समाज संधी मिळावी तसेच सार्वजनिक क्षेत्रात समान सहभाग मिळावा यासाठी संविधानात तरतुदी करण्यात आला त्यामुळे भारतीय स्त्रीला पहिल्यांदा कायदेशीर पातळीवर समान दर्जा प्राप्त झाला.
अशा या असामान्य आणि संघर्षाचे मोठे योगदान देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक आणि ऐतिहासिक कार्य असामान्य आहे अशा या महान चळवळीचे पुरस्करते आणि शिक्षणाचा आग्रह धरणारे आंबेडकरांना विद्यार्थ्यांनी एकत्र येत अभिवादन केले.
या जयंती उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या वर्गातील अनेक विद्यार्थ्यांनी केलेली वेशभूषा.अनेक मुले डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पेहरावात शाळेत आली होती,ज्यामुळे संपूर्ण वातावरण भारावून गेले होते.यावेळी विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी भाषणे केली आणि अतिशय उत्साहात भीमगीते गायली.
या सांस्कृतिक सादरीकरणातून मुलांनी महामानवाप्रती आपली आदरांजली आणि कृतज्ञता व्यक्त केली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक वृंदाने विशेष परिश्रम घेतले. यामध्ये सौ.छाया लोखंडे, श्रीमती द्रौपदाबाई दुर्गुडे, श्रीमती अनिता शेलार, श्रीमती विजया साळुंके,श्रीमती उज्ज्वला घुले तसेच रावसाहेब बोर्डे वसंतराव मुठे आणि शिवाजी मेंगाळ यांचा समावेश होता.कार्यक्रमाच्या शेवटी शिवाजी मेंगाळ यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाची सांगता विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून करण्यात आली.या सोहळ्याला विद्यार्थी आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
