नाशिक प्नतिनिधी- खास लग्नासराईचे औचित्य साधून संगमनेरच्या भोसले प्रतिष्ठानाने २४ मे रोजी नाशिकच्या संत आंद्रीय चर्चमध्ये १७४ व्या ख्रिस्ती वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या सेवाभावी उपक्रमाचे वैशिष्ट हे होते कि प्रमुख मार्गदर्शक मान्यवर सर्व गुणवंत महिलाच होत्या.
उदघाट्न प्रसंगी द्विप प्रज्वलनास सगळ्या महिलांचे हात एकरूप झाले होते. नाशिक सी. एन.आय. धर्मप्रांताच्या अधिकारी सदस्या शार्लेट नाडे मार्गदर्शन करताना म्हणाल्या कि, मुला-मुलींच्या विवाहासाठी अंतिम निर्णय घेण्यासाठी आई वडिलांचा हस्तक्षेप अतिशय गरजेचा असून स्थानिक धर्मगुरूंचाही सल्ला घेणे तितकेच महत्वाचे आहे.
रेव्ह. सलोमी खरे यावेळी म्हणाल्या कि, ख्रिस्ती कुटुंबाचा पाया हा प्रीतीवर आधारित आहे, सासूने सुनेला मुलीसमान वागवण्यातूनच प्रीतीची कृती दिसून येते. ख्रिस्ती बालकांना धर्मशिक्षण देणाऱ्या दिपा पवार मार्गदर्शन करताना म्हणाल्या कि, मुलीने जीवनसाथी निवडताना मुलाच्या कष्टाळूपणाला व त्याच्या प्रेमळ स्वभावाला प्राधान्य द्यावे.
यावेळी नॅशनल सिनियर कॉलेजच्या प्रा.सुहासिनी जाधव म्हणाल्या कि,विवाहासाठी निवड करताना आईवडिलांनी मुलांच्या भावनांचा आदर करून परस्पर संवादातून मार्ग काढला पाहिजे.मुख्याध्यापिका रोहिणी पंडित यांनी असे अवाहन केले कि, मुला मुलींच्या वार्षिक आर्थिक पॅकेजकडे न बघता एकमेकांच्या स्वभावाला आणि संस्काराला अधिक प्राधान्य द्यावे.
मेळाव्यात नाशिकसह संभाजीनगर,मुंबई, अहिल्यानगर, पुणे इत्यादी शहरांतून पालक व इच्छुक उपस्थित होते.
