कला सम्राज्ञी पवळा कला मंचाचा जनजागृतीसाठी पुढाकार
संगमनेर प्रतिनिधी नितीनचंद्र भालेराव जातीनिहाय जनगणनेचे काम दोन टप्प्यात सुरू नुकतेच सुरू झालेले आहे .भारत स्वतंत्र झाल्यानंतर प्रथमच जातीनिहाय जनगणना केली जाणार आहे.पहिल्या टप्प्यात घरांची मोजणी व इतर माहिती संकलित केली जात आहे. दुसऱ्या टप्प्यात जातीनिहाय जनगणना होणार आहे.याबाबत ग्रामीण भागामध्ये जनजागृती करण्याचे काम कला सम्राज्ञी पवळा कला मंचाच्या माध्यमातून घरोघरी जाऊन केले जात आहे.जनगणनेसाठी आवश्यक माहिती व नोंदी करण्याचे सूचना व मार्गदर्शन केले जात आहे.संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत भालेराव यांच्या नेतृत्वाखाली व सूचनेनुसार संस्थेचे सचिव नितीनचंद्र भालेराव व सामाजिक कार्यकर्ते मन्सूर इनामदार हे बौद्ध व मुस्लिम समाज बांधवांच्या घरी जाऊन जनगणने बाबत जनजागृती व प्रबोधन करत आहे.या उपक्रमाचे हिवरगाव पावसा व पंचक्रोशीत कौतुक होत आहे. तसेच बौद्ध धर्मीयांनी बौद्ध धर्म व अनुसूचित जातीची तसेच पाली भाषेचे नोंद जनगणनेत काळजीपूर्वक करण्याचे आवाहन कला सम्राज्ञी कला मंचाचे अध्यक्ष श्रीकांत भालेराव यांनी केले आहे.
केंद्रीय स्तरावर अनुसूचित जातीचे आरक्षण हे जातीय आधारावर आहे व महार, चर्मकार,मातंग, मेहतर,
वाल्मीकी इत्यादी जातींना हे आरक्षण लागू आहे.सर्वच प्रमुख राज्याच्या अनुसूचित जातीच्या सूचीमधे या जाती सूचीबद्ध केलेल्या आहेत.बौद्ध हा धर्म आहे आणि अनुसूचित जाती मध्ये बौद्ध जाती म्हणून समाविष्ट नाही आहे. जर अनुसूचित जाती मधे निर्दिष्ट जातीचा उल्लेख केला नाही किंवा जाती म्हणून बौद्ध अंकित केले तर अनुसूचित जातीची (एससी) जनसंख्या कमी होईल त्याचा विपरीत परिणाम आरक्षण,एस.सी.साठी अर्थसंकल्प निधी,शासनाच्या समाज कल्याणकारी योजना यावर होईल.ही अत्यंत गंभीर बाब आहे म्हणून भावनेच्या आहारी न जाता किंवा अपप्रचाराला बळी न पड़ता वास्तविक लाभ लक्षात ठेवून व कठीण संघर्ष करून मिळविलेले अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य निर्णय घेणे अपेक्षित आहे.जर जाती म्हणून महार किंवा पूर्वाश्रामीची जात इत्यादी अंकित करून धर्म म्हणून “बौद्ध” उल्लेख केला तर अनुसूचित जातीच्या सुविधा,
आरक्षण,लाभ पूर्ववत मिळतील सोबतच बौद्ध धर्मीय म्हणून गणना होईल ज्यामुळे “बौद्ध अल्पसंख्यक” सुविधेचा पण लाभ मिळेल. भारतीय बौद्ध महासभा (बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया) यांनी पण सूचना केली आहे की ज्यांनी अनुसूचित जाती मधून बौद्ध धर्म स्वीकारला आहे त्यांनी पूर्वाश्रमीची जात महार, मातंग, चर्मकार, वाल्मीकी इ.उल्लेख करावा व धर्म बौद्ध अंकित करावे.हा भारतीय बौद्ध महासभेचा निर्णय योग्य अभिनंदनीय आहे.
म्हणून येणारी जनगणना लक्षात ठेऊन समाज बांधवांचे योग्य प्रबोधन केले गेले (म्हणजे हा विश्वास त्यांच्यात निर्माण केला गेला की अनुसूचित जाती सूची मधे निर्दिष्ठ जातीचा व धर्म म्हणून ” बौद्ध धर्म ” उल्लेख केला तरी त्यांचे अनुसूचित जातीचे आरक्षण व इतर सुविधा पूर्वी प्रमाणेच अबाधित राहतील/मिळतील) तर बौद्धांच्या जनसंख्येत लक्षणीय वाढ होईल. याबाबत संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते बौद्ध व मुस्लिम समाजात घरोघरी जाऊन जनजागृती करत आहेत.तसेच मुस्लिम धर्मामधील अनेक जाती इतर मागासवर्ग,भटक्या विमुक्त जाती, विशेष मागास प्रवर्गात मोडत आहेत परंतु त्याची व्यवस्थित माहिती नसल्यामुळे गोंधळ होऊन चुकीच्या नोंदी करू नये यासाठी संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते हिवरगाव पावसा व पंचक्रोशीत जनजागृती करत असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत भालेराव यांनी दिली.
