श्रीरामपूर दिपक कदम मुंबई येथील महाराष्ट्र रायफल असोसिएशनच्या वतीने वरळी येथील एमआरए शूटिंग रेंजमध्ये ३ जून ते ९ जून २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या "२९ व्या कॅप्टन एस. जे. इझेकियल स्मृती महाराष्ट्र राज्य नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धा – २०२६" मध्ये श्रीरामपूरच्या द अल्टिमेट स्पोर्ट शूटिंग अकॅडमीच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत आगामी प्री-नॅशनल नेमबाजी स्पर्धेसाठी पात्रता मिळविली आहे.
या प्रतिष्ठित राज्यस्तरीय स्पर्धेत अकॅडमीच्या खेळाडूंनी विविध गटांमध्ये आपली गुणवत्ता सिद्ध केली. १० मीटर रायफल प्रकारात आर्या राऊत हिने सब युथ, युथ आणि ज्युनिअर गटातून प्री-नॅशनल स्पर्धेसाठी पात्रता मिळवली.
विराज शित्रे याने सब युथ व युथ गटात, तर प्रणव अघाव याने सब युथ गटात पात्रता संपादन केली.१० मीटर पिस्तूल प्रकारात हित बाठीया याने दमदार कामगिरी करत सब युथ, युथ, ज्युनिअर आणि सिनिअर अशा चारही गटांमधून आगामी प्री-नॅशनल स्पर्धेसाठी पात्रता मिळवून विशेष यश संपादन केले.
विशेष म्हणजे,यापूर्वी मार्च २०२६ मध्ये छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेतही अकॅडमीच्या चार खेळाडूंनी प्री-नॅशनल स्पर्धेसाठी पात्रता मिळवली होती. त्यामुळे आतापर्यंत अकॅडमीच्या एकूण आठ खेळाडूंनी प्री-नॅशनल स्पर्धेत स्थान निश्चित केले असून, ही श्रीरामपूरच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.
या सर्व खेळाडूंना द अल्टिमेट स्पोर्ट शूटिंग अकॅडमी,श्रीरामपूरचे प्रशिक्षक केतन विजय वाघ यांचे मार्गदर्शन लाभले. राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू असलेल्या केतन वाघ यांच्या प्रशिक्षणाखाली अकॅडमीतील खेळाडू सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करत असून राज्य व राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवत आहेत.खेळाडूंच्या या यशाबद्दल क्रीडा क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत असून आगामी प्री-नॅशनल स्पर्धेतही ते उत्कृष्ट कामगिरी करून श्रीरामपूर व महाराष्ट्राचे नाव देशपातळीवर उंचावतील,असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
