वृक्षारोपणाचा संदेश देत वृक्षाचे अनोखी भेट
लोणी रुपाली भालेराव राहता तालुक्यातील लोणी बस स्थानक येथे वृक्षभेट देऊन येथील रिक्षाचालकाचा अनोखा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला.
सर्वसामान्यांच्या अडचणीला धावून जाणारे येथील रिक्षाचालक संदीप कदम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून समाजात एक अत्यंत आदर्शवत आणि स्तुत्य पाथेय निर्माण करण्यात आला, पारंपारिक आणि खर्चिक पद्धतींना फाटा देत,त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना एक छोटेसे वृक्ष रोपटे शुभेच्छा भेट म्हणून देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
या अनोख्या आणि पर्यावरणपूरक प्रसंगाच्या माध्यमातून संदीप कदम यांच्या वाढदिवसानिमित्त लोणी बस स्थानक नियंत्रक रावसाहेब पर्वत,स्वराज्य पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण संघटना यांच्या वतीने अहिल्यानगर जिल्हा कार्याध्यक्ष गोपाळ राऊत,राहता तालुका अध्यक्ष रुपाली भालेराव, रिक्षा चालक उपस्थित होते .
या सर्वांच्या सहकार्याने 'वाढदिवसाची भेट वस्तू छोटेसे रोपटे 'या छोट्याशा परंतु नाविन्यपूर्ण क्षण येथे दिसून आला संपूर्ण यावेळी समाजाला वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धनाचा एक अतिशय मोलाचा व सुंदर संदेश दिला गेला.
आजच्या आधुनिक काळात चहुबाजूला वाढणाऱ्या सिमेंटच्या जंगलांमुळे निसर्गाची अतोनात हानी झाली असून,मायेची शीतल सावली देणारे हिरवेगार वृक्ष आता शहरांमधून आणि ग्रामीण भागातूनही फार कमी झाले आहेत.
या वृक्षतोडीचे आणि ढासळत्या पर्यावरणाचे अत्यंत गंभीर दुष्परिणाम आता थेट मानवी जीवनावर आणि आरोग्यावर दिसून येऊ लागले आहेत.म्हणूनच, आता प्रत्येक माणसाने अंतःकरणातून आणि निस्वार्थीपणे या वृक्षांवर प्रेम करण्याची वेळ आली असून,प्रत्येकाने आपल्या आयुष्यात किमान एक तरी झाड लावलेच पाहिजे,अशी भावना याप्रसंगी व्यक्त करण्यात आली.
इतकेच नव्हे तर,समाजात आता एका नव्या सुसंस्कृत प्रथेची सुरुवात होण्याची गरज आहे,ज्यामध्ये कोणत्याही शुभ कार्याला किंवा समारंभाला जाताना महागड्या वस्तूंपेक्षा एक वृक्ष भेट म्हणून घेऊन जाण्याची सवय आपण सर्वांनी स्वतःला लावून घेतली पाहिजे अशा जण भावना यावेळी व्यक्त झाल्या.
पूर्वीच्या काळातील निसर्गाचे वैभव आठवताना ज्येष्ठ नागरिकांकडून शोकांतिका व्यक्त केली जात आहे पूर्वीच्या काळी रस्त्यांच्या कडेला आणि दुतर्फा वडाची,पिंपळाची विशाल व उंच झाडे दिसायची,ज्यांच्या दाट आणि थंडगार गार सावलीचा आनंद घेत लांबचा प्रवास करणारे प्रवासी घटकाभर थांबायचे आणि तिथेच विसावून आपले भोजन करायचे.
मात्र, दुर्दैवाने आता अशी विशाल झाडे कुठेही नजरेस पडत नाहीत, ही भीषण वास्तविकता आहे.यावर एक सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे, वाढदिवस हा आपल्या प्रत्येकाच्या वर्षातून एकदाच येतो आणि या दररोज कोणाचा ना कोणाचा वाढदिवस नक्कीच असतो.
हाच सकारात्मक हेतू डोळ्यासमोर ठेवून,जर प्रत्येक नागरिकाने स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी किंवा इतरांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देताना एक तरी झाड भेट म्हणून देण्याचा निश्चय केला,तर ओसाड माळरानावर देखील हिरवळ पुन्हा परतण्यास मोठा हातभार लागेल.
या छोट्याशा प्रयत्नातून पर्यावरणाच्या वाढीला आणि निसर्गाचा समतोल राखण्यास अत्यंत मोठी मदत होणार आहे.या सत्कार वेळी उपस्थित असलेल्या सर्वच स्तरातील नागरिकांनी या अनोख्या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले असून,हा संदेश प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचणे ही काळाची गरज बनली आहे.
