नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच,टोल वसुली जोरात
संगमनेर प्रतिनिधी नितीनचंद्र भालेराव
नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील अपूर्ण व निकृष्ट कामांमुळे वाहनधारकांचे जीव धोक्यात आले आहेत. महामार्गाचे काम, सर्व्हिस रोड, बोगद्यांतील सुरक्षा उपाययोजना व स्ट्रीट लाईटची कामे पूर्ण होईपर्यंत हिवरगाव पावसा येथील टोल वसुली तात्काळ बंद करावी यासाठी नुकतेच टोलनाका कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसने उपोषण सुरू केले आहे.टोल प्राधिकरण, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण,तसेच शासन व प्रशासनाने उपोषणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे संगमनेर शहराध्यक्ष प्रविण कानवडे यांच्या नेतृत्वाखाली निषेधार्थ प्रतीकात्मक लक्षवेधी सरण आंदोलन केले आहे.
प्रलंबित मागण्या,अन्यायकारक निर्णयांच्या विरोधात प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी लाकडी सरण (चिता) रचून प्रवीण कानवडे यांनी चितेवर बसून सरण आंदोलन केले.या निषेध आंदोलनामुळे शासन किंवा प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे.
गेल्या काही महिन्यांत या महामार्गावर झालेल्या विविध अपघातांत ५० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. शेकडो जखमी वा कायमस्वरूपी अपंग झाले.हे अपघात चालकांच्या निष्काळजीपणामुळे नसून,कंत्राटदार कंपनीने सुरक्षा उपाययोजना न केल्याने झाल्याचा आरोप करीत संबंधित कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रवीण कानवडे यांनी केली आहे.
उपोषण आंदोलन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे,तरी संगमनेर तालुक्यातील बोटा गावापासून ते सिन्नर पर्यंत वाहनधारकांना प्रचंड गैरसोयींचा, अडचणींचा सामना करावा लागत आहे.हा रस्ता वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात धोकादायक बनला आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आवश्यक सुरक्षा उपाययोजना कडे संबंधित कंत्राटदार कंपनीने दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे. महामार्गावर अनेक ठिकाणी दिशादर्शक फलक,चेतावणी फलक,रिफ्लेक्टर्स, ब्लिंकर्स आणि बॅरिकेडिंगचा अभाव असल्याचे प्रवीण कानवडे यांनी म्हटले आहे.क-हे घाट परिसरात स्ट्रीट लाईट नसल्याने रात्रीच्या वेळी अपघातांचा धोका वाढला आहे.
बोगद्यांमध्ये पावसाळ्यात पाणी साचते. यासारख्या अनेक कारणांमुळे वाहतुकीसाठी रास्ता धोकादायक बांधला आहे.
गेल्या काही महिन्यांत या महामार्गावर झालेल्या विविध अपघातांत ५० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला.तर शेकडो जखमी झाले आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक नुकसान भरपाई द्यावी,अपंग झालेल्या नागरिकांच्या उपचाराचा खर्च ठेकेदाराकडून वसूल करावा,संबंधित कंपनीचा ठेका रद्द करून तिला कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकावे,तसेच महामार्गाच्या कामाचे आयआयटी किंवा तत्सम स्वायत्त संस्थेमार्फत 'धर्ड पार्टी क्वालिटी अँड सेफ्टी ऑडिट' करण्याची मागणी आंदोलना दरम्यान करण्यात आली आहे.
लक्षवेधी सरण आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसने शहराध्यक्ष प्रवीण कानवडे,महिला जिल्हाध्यक्ष वैशाली राऊत,सरला भुजबळ,रईस पठाण,भाऊ म्हस्के,अमोल म्हस्के, प्रवीण कासार,राजेंद्र पानसरे यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले आहेत तसेच या आंदोलनाला हिवरगाव पावसा व पंचक्रोशीतील नागरिकांचा विविध संघटनांचा पाठिंबा मिळत आहे.
