दिवंगत विलास यशवंत पवार
पुण्यस्मरणा निमित्त वृद्धाश्रमात जेवण
संगमनेर नितीनचंद्र भालेराव तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही डिजिटल शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी तसेच सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी दिवंगत विलास यशवंत पवार यांच्या पाचव्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून पवार परिवाराने अभिनव सामाजिक उपक्रम राबविला.नंदा पवार यांच्या संकल्पनेतून संगमनेर तालुक्यातील खराडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी संगणक संच भेट देण्यात आला.
यानिमित्ताने राजाराम पाटील वृद्धाश्रमातील आजी-आजोबांना गोड जेवण देऊन त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधण्यात आला.दिवंगत विलास यशवंत पवार यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त पारंपरिक धार्मिक विधींऐवजी समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा निर्णय पवार परिवाराने घेतला.आजचे युग हे संगणक आणि तंत्रज्ञानाचे युग आहे, ही गरज ओळखून इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने शाळेला संगणक संच देण्यात आला.संगणक भेट मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आता आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान प्रत्यक्ष अनुभवातून घेता येणार आहे.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला तसेच डिजिटल साक्षरतेला निश्चितच चालना मिळणार आहे.
सामाजिक बांधिलकी जपत पवार परिवाराने राजाराम पाटील वृद्धाश्रमाला भेट देऊन तेथील सर्व आजी-आजोबांना स्वादिष्ट जेवण दिले. ज्येष्ठ नागरिकांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या सुख-दुःखाची विचारपूस करण्यात आली. यावेळी पवार परिवाराने ज्येष्ठांना मायेचा घास भरवत कुटुंबीयांच्या जिव्हाळ्याची अनुभूती दिली.
स्वातंत्र्य दिन आणि पुण्यस्मरणाचा संगम साधत समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा पवार परिवाराचा हा आदर्श उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरला आहे.खराडी ग्रामस्थ,शाळेतील शिक्षक,पालक तसेच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातून पवार परिवाराच्या या उपक्रमाचे कौतुक होत असून,सामाजिक बांधिलकीचा हा आदर्श इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.
