श्रावणाच्या सरींसोबत मनात कृष्ण भक्तीची चाहूल लागते आणि बाळकृष्ण पासून योगेश्वरापर्यंत त्याची निरनिराळी रूप मनाला भावून टाकतो.प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा कधी हा लाडका कान्हा असतो तर कधी सखा असतो तर कधी पाठीराखा होऊन त्या सारखी बनवून श्रीकृष्ण आजही प्रत्येकाला जगण्याची नवी दिशा दाखवतो.भारतीय धर्म, अध्यात्म आणि संस्कृतीच्या विशाल आकाशामध्ये श्रीकृष्णाचे तेजोमयी ज्योत आहे.
बालकृष्णाच्या विलोभनीय हास्यापासून ते कुत्रोक्षेत्रावर भगवद्गीतेचा दिव्य उपदेश करणाऱ्या योगेश्वरापर्यंतच्या त्याच्या जीवनाचा प्रवास मानवी जीवनातील जवळजवळ प्रत्येक भावनेला स्पर्श करणारा आहे.प्रेम, करुणा,मैत्री,धैर्य,कर्तव्य
न्याय,नेतृत्व, ज्ञान आणि शुद्ध भक्तीचा हा सर्वांग सुंदर संगम म्हणजे श्रीकृष्ण.कारागृहात जन्म,बालपणी पुतना, शकासुर, तृणावर्त यांसारख्या असुरांचा सामना, कालियामर्दन, गोवर्धनधारण, कंसवध, द्वारकेची स्थापना आणि
पुढे महाभारतातील धर्मसंस्थापनेची भूमिका—श्रीकृष्णाचे जीवन संकटापासून दूर नव्हते, परंतु प्रत्येक संकटाला त्यांनी भगवंताच्या इच्छेने आणि धर्माच्या दृष्टीने स्वीकारले. म्हणूनच कृष्णाचे जीवन आपल्याला सांगते की परिस्थिती आपल्या हातांत नसते,तरी परिस्थितीकडे पाहण्याची आपली दृष्टी आपल्या हातांत असते.
भक्तीचे गूढ तत्त्व समजून घेताना बालकृष्णाची लीला ही भारतीय भक्तिपरंपरेचे हृदय आहे. यशोदामातेच्या मंदीर खेळणारा लाडका कान्हा, गवळणींसोबत गाई चारणारा सखा,लोणी चोरणारा माखनचोर, कालियाच्या फण्यावर नृत्य
करणारा नटवर आणि गोवर्धन पर्वत करंगळीवर धारण करणारा गिरधारी—या प्रत्येक लीलामागे भक्तीचे एक गूढ तत्त्व आहे. कृष्णाची लीला केवळ ऐकण्यासाठी सुंदर कथा नाही, ती भगवंताशी आपले नाते जागृत करण्याचे माध्यम आहे. श्रद्धेच्या बळाने संकटावर मात कशी करावी, हे गोवर्धन लीला विशेष महत्त्वाची आहे.
इंद्राचा अहंकाराचा घडा भरताना श्रीकृष्णांनी वृंदावनवासीयांना गोवर्धनाची पूजा करण्यास प्रेरित केले. या लीलामध्ये निसर्ग, गोधन, समाज आणि परमेश्वर यांच्यातील परस्परसंबंधाचा सुंदर संदेश आहे.
भगवंताचे आश्रय घेतल्यावर सामूहिक एकता आणि श्रद्धेच्या बळावर संकटावर मात करता येते. फक्त ही श्रद्धा अतिशय हृदयापासून आणि समर्पित भावनाने हवी, हे गोवर्धन लीला शिकवते.
भक्तीत भावनेची किंमत आजच्या काळात अत्यंत महत्त्वाची ठरते.
आजच्या जगात मैत्री, मित्रांमधील विश्वास ही अत्यंत दुर्मिळ गोष्ट होत चालली आहे. अनेक जण स्वतःची थोडीशी प्रगती होताच,थोडा पैसा आणि प्रसिद्धी कमावताच जुन्या गरीब, साधारण मित्रांना बोलणे टाळतात, त्यांचा अपमान करतात, त्यांना हीणवतात. अशा गर्विष्ठ, अहंकाऱ्यांनी कृष्णाच्या मित्रप्रेमाची महती लक्षात ठेवली पाहिजे.
कृष्णाचे सुद्धाम्याशी असलेले सख्य अत्यंत हृदयस्पर्शी आहे. द्वारकेचा ऐश्वर्यसंपन्न राजा असूनही बालपणीच्या मित्राला पाहताच श्रीकृष्णाने त्याला प्रेमाने आलिंगन दिले. सुदाम्याच्या हातातील साधे पोहेही त्यांनी अमूल्य प्रेमाने स्वीकारले.
भक्तीमध्ये वस्तूची किंमत नसते, भावनेची किंमत असते—हा संदेश या लीलेमधून मिळतो.
कर्मयोगाची शिकवण श्रीकृष्णांच्या जीवनाचा सर्वोच्च तात्त्विक क्षण कुरुक्षेत्रावर प्रकटतो. अर्जुनाच्या हातातील बाण खाली पडले असताना
श्रीकृष्णांनी त्याला केवळ युद्ध करण्याची प्रेरणा दिली नाही; त्यांनी आत्मा, कर्म, ज्ञान, योग आणि भक्ती यांचे शाश्वत तत्त्वज्ञान सांगितले.
जीवनातील कर्म सोडायचे नाही, तर ते योग्य भावनाने भगवंताला अर्पण करायचे—ही कृष्णाची कर्मयोगाची शिकवण आहे.
वास्तवी ठिकाणी कृष्णभावनेचे वैशिष्ट्य स्पष्ट होते. भक्ती म्हणजे जगापासून पलायन नव्हे,भक्ती म्हणजे जगामध्ये राहून आपल्या प्रत्येक कृतीला आध्यात्मिक दिशा देणे.घर, व्यवसाय, शिक्षण, समाजसेवा,कला, संस्कृती किंवा कोणतीही फळाची अपेक्षा न करता आपले काम करत राहणे.
हा विचार अंगीकारून जेव्हा मनुष्य आपले कर्म प्रामाणिकपणे पार पाडतो, तेव्हा त्याचे जीवनच एक सुंदर उत्सव बनून जाते. श्रीकृष्ण हा केवळ पौराणिक महापुरुष नसून मानवी मनाला प्रगल्भ करणारा, संकटात धीर देणारा आणि प्रत्येक पावलावर योग्य मार्ग दाखवणारा दिव्य-अद्भुत स्त्रोत आहे.
दहीहंडी उत्सव साजरी करताना लहान मोठेपणा गरीब श्रीमंत सारे काही विसरून एकत्र येत असतो.मग काय बाळ गोपाळांचा उत्साह अगदी शिगेला पोहोचलेला असतो दहीहंडी असते आत्मविश्वास आणि सन्मानाची. अनेक ठिकाणी काल्याच्या कीर्तनाची देखील दहीहंडी फोडूनच सांगता केली जाते मानवी आयुष्यात असणारा गर्वाची दहीहंडी फोडून एका अद्भुत आणि अद्वितीय संस्कृती जपून समाजामध्ये प्रत्येकाने वावरण्याची गरज आहे.
रुपाली भालेराव लोणी ता.राहाता
